Vijay Sales [CPS] IN

Saturday, March 6, 2021

आडनाव टाकलं अन् मुंबई गाठली; ‘पोपट फेम’ आनंद शिंदेंचं खरं आडनाव माहिती आहे का?

 

नावात काय आहे?,' असं महान नाटककार शेक्सपियर म्हणाला होता. त्यावर नावातच बरंच काही आहे, असाही युक्तिवाद केला जातो.




‘नावात काय आहे?,’ असं महान नाटककार शेक्सपियर म्हणाला होता. त्यावर नावातच बरंच काही आहे, असाही युक्तिवाद केला जातो. काही असो. पण नाव, आडनाव या गोष्टी आजही भारतीय समाजव्यवस्थेत बऱ्याच काही गोष्टी सांगून जातात. नाव, आडनावावरून तुमचं स्टेट्सही ठरतं अन् तुमची एक इमेजही तयार होते. आता हेच पाहाना लोकप्रिय गायक आनंद शिंदे यांचं आडनाव दुसरंच काही असतं तर त्यांना एवढी प्रसिद्धी मिळाली असती का?… हा झाला गंमतीचा भाग… पण आनंद शिंदे यांचं खरं आडनाव शिंदे नाही, दुसरंच आहे… वाटलं ना आश्चर्य! पण ते खरं आहे… आनंद शिंदे यांचं खरं आडनाव काय? आणि ते कसं बदललं? शिंदे हे आडनाव कसं आलं? त्याचाच हा किस्सा.....
भगवानबाबा आणि भजन

आनंद शिंदे यांच्या आजोबांचं नाव भगवान शिंदे. भगवानबाबा सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्याचे. शिंदे कुटुंबीयांचं घराणं चोखामेळा परंपरेतील गोसावी घराणं. गाणी गाणं, भजन करणं आणि भिक्षा मागून ऊदरनिर्वाह करणं हे शिंदे घराचं काम. त्या काळात दलित कुटुंबातील प्रत्येकाच्या वाट्याला कमीअधिक प्रमाणात हे जगणं होतं. व्यवस्थेनं दिलेलं हे काम शिंदे कुटुंबाकडेही आलं नसतं तर नवलंच. अत्यंत दारिद्रय असल्याने भगवानबाबांनी 1917-18च्या सुमारास मुंबई गाठली. मुंबईत येताच भगवानबाबांनी ‘खवताडे’ हे पूर्वाश्रमीचं आडनाव टाकलं अन् शिंदे आडनाव धारण करून नव्या जीवनाला सुरुवात केली. त्यानंतर घरातील सर्वांनीच खवताडे आडनाव टाकून शिंदे हे नावच धारण केलं. गायनाच्या कार्यक्रमात ओळख देताना असो, शाळा, रेशनचं कार्ड असो की दवाखाना… प्रत्येक ठिकाणी या कुटुंबातील प्रत्येक सदस्याने शिंदे हेच आडनाव लावलं आणि हेच आडनाव पुढे कायमही झालं. त्यामुळेच भगवानबाबांनी त्यावेळी आडनाव टाकलं नसतं तर ‘आनंद शिंदे’ यांनाही ‘आनंद खवताडे’ हेच नाव घेऊन वावरावं लागलं असतं.

आता मला मरण आलं तरी चालेल…

आनंद शिंदे यांचे अनेक किस्से आहेत. त्यातला एक संस्मरणीय किस्सा त्यांनी सांगितला. हा प्रसंग आजही त्यांना जशाच्या तसा आठवतो. तेव्हा आनंद हे नावारुपाला आले नव्हते. पण गायक म्हणून तयार होत होते. प्रसिद्ध गायक गोविंद म्हशीलकर यांच्या घाटकोपर येथील श्रद्धांजली सभेच्या कार्यक्रमातील हा किस्सा आहे. म्हशीलकरांना श्रद्धांजली म्हणून गायनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. महाराष्ट्रभरातून अनेक गायक आल्याने प्रत्येकाला संधी मिळावी म्हणून प्रत्येक गायकाला गाण्यासाठी पाच मिनिटाची संधी देण्यात आली होती. पाच मिनिटे होताच आयोजक माईक बंद करायचे. आपला पुतण्या आणि प्रसिद्ध संगीतकार, गायक विठ्ठल शिंदे यांना आनंद यांना गाण्याची संधी देण्याची विनंती केली. विठ्ठल शिंदे आनंद यांना संधी द्यायला तयार झाले. पण त्यांनी एक अट घातली. रेकॉर्डिंगच्यावेळी प्रल्हाद शिंदे हजर राहणार असतील तरच आनंदला संधी देतो, असं ते म्हणाले. त्यामुळे ठरल्याप्रमाणे प्रल्हाद शिंदेही आनंद यांना सोबत घेऊन रेकॉर्डिंगला गेले. आनंद यांना दोन गाणी गाण्याची संधी देण्याच्या अटीवरून प्रल्हाददादांनी व्हिनसमध्ये रेकॉर्डिंग केली.

पत्र नव्हे समजावी तार, निघा लवकर,
बघाया नाजूक सुकुमार,
धनी गत वर्षीची थकबाकी,
झाली एकदम दोन पोरं… !!!

आणि

दाट गर्दी गं सखे पुनागाडीला….

ही दोन गाणी आनंद यांच्या आवाजात रेकॉर्ड झाली. या गाण्यांना विठ्ठल शिंदे यांनीच संगीत दिलं होतं. कॅसेट बाजारात आली, हातोहात खपली. पण आनंद यांना म्हणावी तशी अजूनही प्रसिद्धी मिळाली नव्हती. त्यांना स्टारडम दिलं ते ‘पोपटा’च्याच गाण्याने.

एक गाणं… ज्यांनी त्यांना चळवळीत आणलं

आनंद शिंदे यांनी अनेक गाणी गायली. लोकगीतं गायली, धार्मिक गाणी गायली, आंबेडकरी गीतं गायली, भारूडं, पोवाडे, सिनेमा गीतं यासह अनेक गाणी गायली. पण त्यांच्या आयुष्यात एक असं गाणं आलं ज्याने त्यांचं आयुष्यच बदलून गेलं.

सैनिक व्हा भीमाचे, भीमराज आठवा रे,
चला निळ्या निशाणाखाली, सर्वांनी एक व्हा रे !!

आंबेडकरी चळवळीची दशा आणि दिशा मांडणारं हे गाणं आनंद शिंदेंनी गायलं. आजही प्रत्येक जयंती उत्सवात हे गाणं आवर्जून वाजवलं जातं. हे गाणं गायल्यानंतर आनंद शिंदे स्वत: अस्वस्थ झाले. आणि त्यानंतर ते ऐक्यवादी बनले. गटातटात विखुरलेली आंबेडकरी चळवळ रिपब्लिकन पक्षाच्या झेंड्याखाली एकत्र आणण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून सुरुवात केली. रिपब्लिकन नेते रामदास आठवले, गंगाराम इंदिसे आणि मनोज संसारे यांच्यासोबत राहून त्यांनी रिपब्लिकन नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्नही केला. रिपब्लिकन नेते एकत्र यावेत, असं त्यांना आजही वाटत असतं.


No comments:

Post a Comment